आज महर्षी वेदव्यास यांची जयंती. महर्षी व्यास हे सत्यवती आणि ऋषी पराशर यांचे
पुत्र. महर्षी व्यास अमर आहेत. त्यांना विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक मानलं जातं. महर्षींचं
खरं नाव ‘कृष्णद्वैपायन’. व्यासांचा जन्म यमुना नदीच्या एका द्वीपावर झाला, म्हणून
‘द्वैपायन’ आणि त्यांचा रंग सावळा होता, म्हणून ‘कृष्ण’. म्हणून सत्यवती-पराशर यांच्या
मुलाचं नाव ‘कृष्णद्वैपायन’ ठेवण्यात आलं. व्यासांना हिंदू धर्माचे आद्य पुरुष तसेच
आद्य गुरुही म्हटलं जातं.
आपल्या वेदांचं वेळोवेळी विभाजन करण्यात आलंय. एकूण २८ वेळा वेदांचं विभाजन झालंय.
द्वापरयुगात विष्णू अवतारातल्या कृष्णद्वैपायन यांनी वेदांचे चार भाग केले म्हणून त्यांना
द्वापारयुगातील ‘वेदव्यास’ (वेदांचे विभाजन करणारे) म्हटलं जातं. हे चार भाग म्हणजे
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. व्यासांनी १८ महापुराणं, श्रीमद्भागवत, ब्रह्मसूक्त,
महाभारत यांचीही रचना केली.
द्वापरयुग संपता संपता व्यासांना अनुभूती झाली की कलियुगात मानवाचं आयुष्य खूपच
कमी असेल तसेच त्याची शारीरिक आणि बौद्धिक शक्तीही खूप कमी होईल. तेव्हा मानवाला वेदांचा
अभ्यास करणं आणि त्यांना समजून घेणं कठीण जाईल, म्हणून कलियुगातल्या मनुष्यासाठी व्यासांनी
‘महाभारत’ ग्रंथाची निर्मिती केली. चारही वेदांचं सार आणि धर्म, नीति, उपासना, विज्ञान,
ज्ञान अशी शिकवण या ग्रंथात आहे.
व्यासांनी आपल्या चार शिष्यांना एकेक वेद शिकवला. मुनी पैल यांना ऋग्वेद, वैशंपायन
यांना यजुर्वेद, जैमिनी यांना सामवेद, यांना अथर्ववेद शिकवला आणि पाचवे शिष्य लोमहर्ष
यांना महाभारत हा ग्रंथ शिकवला. हे पाचही शिष्य जेव्हा आपापल्या ग्रंथांमध्ये निपुण
झाले, तेव्हा आपल्या गुरुचे आभार मानण्यासाठी या पाचही शिष्यांनी ‘आषाढ पौर्णिमे’ला
गुरु वेदव्यास यांचं पूजन करून आभार व्यक्त केले. तेव्हापासून आजच्या दिवशी हिंदू धर्मात
गुरु पूजनेच्या प्रथेला सुरुवात झाली.
आदिगुरु शंकराचार्य यांनी चार दिशांना चार मठ स्थापन करून या गुरु-शिष्य परंपरेला
पुनरुज्जीवित केलं.