Tuesday, 5 July 2016

गंगा सप्तमी



आज वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच ‘गंगा सप्तमी’. काही ठिकाणी हा दिवस ‘गंगा जयंती’ म्हणूनही साजरा केला जातो.

आपल्या पूर्वजांना कपिल मुनींच्या शापापासून मुक्त करून त्यांच्या आत्म्यांना शांती लाभण्यासाठी कठोर तप करून ‘भगीरथा’ने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं. पण स्वर्गातून पृथ्वीवर येण्याच्या मार्गात एक अडथळा होता. “माझ्या पाण्याचा वेग प्रचंड आहे. या धारांच्या वेगाने पृथ्वी फाटून माझं पाणी पाताळात शिरेल आणि, पृथ्वी आणि पाताळ एक होतील”, असं सांगून गंगा भागीरथला म्हणाली, जर तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं तुला वाटत असेल तर या अडथळ्याला दूर कर.

तेव्हा यावर विष्णूंनी महादेवांना यासाठी मदत करायला सांगितली. अती वेगवान गंगेच्या धारा आपल्या जटांमध्ये बांधायला सांगितल्या, त्यामुळे गंगेचा वेग कमी होऊन पृथ्वी पाताळात धसणार नाही.

यासाठी महादेव आनंदाने तयार झाले. गंगा जलधारांच्या रुपात पृथ्वीवर जाण्यास तयार झाली. पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करता क्षणी त्या धारांचा वेग प्रचंड वाढला. ढग गडगडू लागले. महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली. गंगेचा भयंकर वेग पाहून पृथ्वी घाबरली. थरथर कापू लागली.

आणि त्याच वेळी महादेव गंगेच्या मार्गात आले, भयंकर वेगात गंगा महादेवांच्या जटेत जाऊन बसली. तो दिवस होता वैशाख शुद्ध सप्तमी, वेळ मध्यान्हीची. हा दिवस गंगेच्या सर्व काठांवर उत्साहाने साजरा केला जातो. गंगेची याच दिवशी स्वर्गातून जलधारांच्या रुपात उत्पत्ती झाली म्हणून काही ठिकाणी आजच्या दिवशी गंगा नदीचा जन्मोत्सवही साजरा केला जातो. आजच्या दिवशी गंगा स्नान, गंगा पूजन आणि दानाचं महत्त्व आहे.

गंगा सप्तमीला गंगा महादेवांच्या जटेत जाऊन बसली. त्यानंतर, महादेवांनी आपल्या बांधलेल्या जटांपैकी एक जटा / बट सोडून गंगेची जलधारा पृथ्वीवर सोडली. गंगेची धार अतिशय मंद गतीने पृथ्वीवर पडू लागली, वेग कमी असल्याने पृथ्वी पाताळात धसण्यापासून वाचली.


No comments:

Post a Comment