Wednesday, 29 June 2016

गांधी वध कट रचल्याचं ठिकाण



एखाद्या आवडत्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास ज्या वास्तूत घडतो, ती वास्तू त्या व्यक्तिमत्वाच्या चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाची असते. त्या वास्तूसाठी ह्रदयात कुठेतरी विशेष स्थान असतं. "तेथे कर माझे जुळती" अशी भावना असते. मग असं व्यक्तिमत्व म्हणजे कलाकार, नेता, स्वातंत्र्य सैनिक, वगैरे कोणीही असू शकतं.
 
इतिहासात काही उल्लेखनीय घटना घडल्या आहेत, ज्यांचे दीर्घ परिणाम आपल्या मातृभूमीवर दिसले आहेत. काही परिणामांचे भोग लोकांना भोगावे लागले आहेत तर काही परिणामांची चांगली/वाईट फळं या देशाने चाखली आहेत. अशा अनेक घटना आहेत, त्यातली एक घटना 'गांधी वध'. गांधी वध आणि त्याचे परिणाम याबद्दल वेगळं लिहायची गरज नाही.
 
गांधी वध करण्यापूर्वी त्याचा कट रचला गेला. तो कसा करावा याबद्दल बरीच खलबतं झाली. गोडसे, आपटे सहीत चार हिंदूमहासभा सदस्य यांच्या छुप्या बैठकी व्हायच्या आणि त्या बैठकीत हा वधाचा कट रचला गेला. जिथे हा कट रचला गेला ती वास्तू खरंच महान म्हणायची, त्या जागी हे कटाचं कार्य घडलं !
 
माझं जे माहेर आहे, त्याच्या अगदी शेजारी ही वास्तू आहे, एकदम लागून. यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते. लहानपणी आम्ही तिथे खेळायला जायचो. एवढंच नाही तिथे काही काळ राहण्याचं भाग्यही आम्हाला मिळालं. मूळ मालकांनी ते एक मजली घर दुसऱ्यांना विकलं. नवीन मालकांनी त्या घराच्या मूळ साच्यात काहीही बदल केला नाही. त्यामुळे आजही त्या घराच्या त्या खोल्या गोडसे, आपटे सहीत चौघांच्या त्या ऐतिहासिक कटाची साक्ष देतात.
 
मी याही बाबतीत स्वतःला नशिबवान मानते कारण आमचा वाडा शांत उभा राहून त्या चौघांना पहात होता, ऐकत होता...!

No comments:

Post a Comment