Friday, 1 July 2016

पाऊस सुरु होण्यापूर्वी...



आज ९ जून पण मान्सून सोडा, मान्सूनपूर्व पाऊसही बघायला मिळाला नाही. गेला पावसाळा जो पाऊस साथ सोडून गेला त्यानंतर त्याचं दर्शन नाही. त्यामुळे त्याचं एक ओझरतं दर्शन घेण्यासाठी मन आसुसलं आहे. डोक्यावर गरागरा फिरणारा पंखा आता नकोसा झालाय. हे सगळं जरी असलं तरी आता वातावरण बदललं आहे.

पूर्वीसारखं रखरखीत ऊन आता दिसत नाही. राकट, रांगड्या व्यक्तिमत्वाला प्रेमाचा पाझर फुटावा आणि त्या राकट व्यक्तिमत्वाचं मनही थोडं कोमल व्हावं त्याप्रमाणे आता ऊनही कुंद हवेमुळे थोडं कोमल झालंय. आकाशात दिसणारा पांढरा शुभ्र पिंजलेला कापूस इतके महिने असलेली निरभ्र आकाशाची एकछत्री राजवट संपुष्टात आणू पहात आहे. हिवाळा जेव्हा आपलं सामान बांधून इथून गेला तेव्हा जाताना गार वारं हा प्रकारही आपल्याबरोबर घेऊन गेला. मग त्यानंतर वारं सुटलं तर ते बहुतेक करून गरमच. पण सध्या बाहेर एकदम गार वारं सुटलंय. बाहेरची झाडंही त्या वाऱ्याच्या तालावर मोकळेपणाने डोलताना फारच छान वाटत आहेत. हवीहवीशी वाटणारी ती गार गार वाऱ्याची झुळूक अनुभवण्यासाठी मुद्दाम घरातला पंखाही बंदच ठेवलाय.

मध्येच क्षीण ऊन आणि मध्येच आभाळ, आकाशात जमलेले पिंजलेल्या पांढऱ्या कापसासारखे दिसणारे ढग आणि त्याच्या बदलत जाणाऱ्या निरनिराळ्या आकृती, थोडीशी कुंद हवा, सुटलेला गार वारा आणि त्यावर डोलणारी झाडं, त्याच वेळी या गार वाऱ्याच्या झुळकीमुळे प्रफुल्लित होणारं आपलं मन आणि शरीर. कडक उन्हाळ्यानंतर हे आहे निसर्गाचं बदललेलं रुप, पावसाळा सुरु होण्यापूर्वी धारण केलेलं. जणू काही पावसाळा येण्यासाठी निघालेला आहे असा निरोप घेऊन आलेलं. पण एक निसर्गाचं वेगळं रुप, स्वतःचं एक वेगळं सौंदर्य ल्यालेलं.

निसर्ग रौद्र रुपही दाखवतो, पण त्यात एक संदेश असतो...मानवासाठी दिलेला.

नाहीतर, निसर्ग हा निर्मळ, निरपेक्षच असतो. त्याचं प्रत्येक रुप हे सुंदरच असतं. प्रत्येक रुपात सौंदर्य दडलेलं असतं, फक्त ते सौंदर्य बघण्यासाठी तशी दृष्टी हवी.

तो.....दुःखी तंद्री लागलेला रिक्षावाला



आपण रिक्षा / टॅक्सीने प्रवास करतो. तेव्हा त्या चालकाकडून आपली एवढीच अपेक्षा असते की त्याने आपल्याला इच्छित स्थळी सुखरुप पोहोचवावं आणि योग्य ते भाडं आकारावं. बाकी आपला आणि त्या चालकाचा काहीच संबंध नाही. आपण जेव्हा या वाहनांमध्ये बसतो तेव्हा आपला विशिष्ट मूड असतो, चांगला वाईट. मूड खराब असेल तर उगाचच या चालकांच्या अंगावर ओरडतानाही मी लोकांना पाहिलंय, जे खरं तर चूक आहे. मग अशा वेळी बहुतेक करून हे चालक गप्प बसतात. दुर्लक्ष करतात.

पण या चालकांच्या मूडचं काय ? ते आपल्याशी बहुतेक करून काही बोलत नाहीत म्हणजे ते नेहमीच आनंदी, उत्साहीच असले पाहिजेत असं काही नाही. काही चालक तर नाईलाजाने हे काम करत असतात. गाडी चालवत असताना आपण छान मागे बसलो आहोत पण कुणास ठाऊक हा चालक कुठल्या परिस्थितीत गाडी चालवत असेल ! आपल्याला काहीच कळत नाही.

काल संध्याकाळी मी अशाच एका रिक्षेत बसले. संध्याकाळच्या वेळी ज्या ठिकाणाहून घरी येण्यासाठी मी रिक्षा शोधत होते, त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी मला क्वचित लवकर रिक्षा मिळते. फार फार त्रास होतो एक रिक्षा मिळण्यासाठी. तर काल मला लगेच रिक्षा मिळाली. मी हात केल्यावर या या ठिकाणी येणार का असं विचारल्यावर त्या रिक्षावाल्याने अतिशय बधीरपणे बसा या अर्थाने डावीकडे मान वळवली. त्याच्या बधीरपणाशी मला काहीच देणंघेणं नव्हतं. घर जवळ आल्यावर इथे अमुक बाजूला वळा असं त्याला सांगितलं. तो बधीरच, अंअंअं...... असं काहीतरी तो बडबडला. पण त्याला ते बहुतेक कळलं होतं. पण तरी मी त्याला हिंदीतही सांगितलं. जिथे थांबवायला सांगितली तिथे त्याने रिक्षा थांबवली. शांत, कुठलेही भाव चेहऱ्यावर नाहीत असा बसून राहिला. इतके झाले असं म्हणत, मीच त्याला मीटरप्रमाणे पैसे द्यायला लागले. नोटा दिल्या, मग म्हणाले, एक मिनीट हं वरचे पैसे देते. तो मख्खच. मीटरवर किती आकडा आहे हे त्याने न पाहता मीटर पाडूनही टाकला. मी वरची सुट्टी नाणी दिली. त्याने न मोजता ती खिशात टाकली. तेवढ्यात एक मुलगी आली. अमुक अमुक ठिकाणी येणार का, तिलाही मख्खपणे हो म्हणाला.

मी रिक्षेतून उतरले. मनात म्हटलं, काय हा असा ! ना मीटर पाहिला, ना पैसे मोजून घेतले ! त्याच्याकडे बघून मला वाटलं की हा बहुतेक जबरदस्त प्रॉब्लेममध्ये आहे. हा शरीराने रिक्षा चालवत आहे पण मनाने दुसरीकडेच आहे. रिक्षेवर पोट आहे, तेव्हा रिक्षा चालवायलाच हवी म्हणून हा रिक्षा चालवत आहे. असं काहीतरी मला त्याच्याकडे बघून वाटलं. दुसऱ्या क्षणी माझ्या मनात विचार आला, याचा जो काही प्रॉब्लेम असेल, त्यातून तो बाहेर पडू देत. अशा शुभेच्छा माझ्याकडून त्याला दिल्या गेल्या. माहीत नाही, मला जे वाटलं ते बरोबर की चूक पण काल त्या रिक्षावाल्याला आपण अचूक वाचलंय, असं मला तरी वाटतं.

काय माहीत माझ्या शुभेच्छा त्याला उपयोगी पडतीलही !

गुलमोहर



वसंत ऋतू जवळ आला किंवा थोडक्यात उन्हाळा जवळ आला, की सृष्टीत खूप बदल होताना दिसतात. त्यातला एक नेत्रसुखद बदल म्हणजे, ‘गुलमोहर’ या झाडाचं फुलणं.

गुलमोहर या शब्दाची फोड केली की, या झाडाची व्याख्याच स्पष्ट होते. गुल म्हणजे फुल आणि मोहर म्हणजे फुललेला पिसारा किंवा बहरलेला पिसारा. एरवी कधीही हे झाड आपलं लक्ष वेधून घेणार नाही. अक्षरशः हे झाड ओसाड पडलेलं असतं, पण उन्हाळा जवळ आला की या झाडाला पालवी फुटू लागते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते. अशी खूप कमी झाडं असतील, ज्यात पानांची संख्या खूप कमी आणि फुलांची संख्या खूप जास्त, गुलमोहर हे एक त्यातलं उदाहरण.

वसंत ऋतू जवळ आला की या ओसाड झाडावर नवीन पालवी दिसायला लागते, हळूहळू एकदोन फुलं दिसायला लागतात आणि आठवडाभरात पूर्ण झाड बहरतं, झाडावर फक्त फुलं दिसतात, फुलांच्या रंगाचंच झाड होऊन जातं. हा असा या झाडात होणारा बदल खूप मनोहारी असतो. हे झाड मधमाशांसाठी पण खूप उपयुक्त आहे. गुलमोहराच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मकरंद, म्हणजेच फुलांचा रस ज्यापासून मधमाशा मध तयार करतात, तो असतो. तसेच मधमाशांना मोठ्या प्रमाणावर परागकण ही या फुलांपासून मिळतात. या झाडाचं परागीकरण बहुतेक करून पक्षीच करतात. 

माणसाला कडक उन्हाळा सहन करावा लागतो. पण तो सुसह्य करण्यासाठी निसर्गाने आपल्याला किती मदत केली आहे ! यात मानवाचा पूर्ण विचार केलेला दिसून येतो. उन्हाळा सहन व्हावा, शरीराला गारवा मिळावा, म्हणून कैऱ्या ही अनमोल भेट जशी निसर्गाने मानवाला दिली तसाच विचार गुलमोहरामागे दिसून येतो. उन्हाळा नसताना या झाडाचं अस्तित्त्वही मानवाला जाणवत नाही पण उन्हाळा जवळ आला की हे झाड बहरू लागतं. बाहेर कितीही कडक ऊन असू देत, तापमान कितीही जास्त असू देत, हे झाड पूर्ण बहरणारच. ज्याप्रमाणे कैऱ्या शरीराला गारवा देतात, त्याप्रमाणेच अत्यंत कडक उन्हाळ्यात डोळ्याला दिलासा देण्याचं काम हे झाड करतं. एक नेत्रसुखद अनुभव हे झाड देतं.

जून-जुलै पर्यंत साधारण ही फुलं झाडावर असतात. तोपर्यंत पाऊसही सुरू होतो, हवेचं तापमान कमी होऊ लागतं. त्यानंतर ही फुलं गळू लागतात. तरी साधारण नोव्हेंबरपर्यंत आपण झाडावर फुलं बघू शकतो. जेव्हा फुलं झाडावर असतात, तेव्हा सुखद अनुभव मिळतोच, पण फुलांची गळती सुरु झाली की त्या त्या रस्त्याचं सौंदर्य खूप वाढतं. रस्त्यांवर फुलांच्या रंगाचा गालीचा बघायला मिळतो, आधीच पाऊस सुरु झाल्याने मन प्रफुल्लित असतं त्यात ह्या गालीच्यामुळे भरच पडते.

गुलमोहराच्या फुलांचा उपयोग श्रीकृष्णांच्या मुकुटाचा शृंगार करण्यासाठीही केला जातो. या झाडाच्या वैशिष्ट्यांमुळे या झाडाचं स्थान खूप वरचं आहे.